प्रभाकर कोळसे:हिंगणघाट
कोरोना संसर्गाचे पार्श्र्वभूमीवर कोरोनाच्या कालखंडात शाळा बंद होत्या. त्या काळातील चार महिन्यांसाठीच्या कार्यदिनाच्या ८८ दिवसांसाठीचा पोषण आहार विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी इयत्ता पहिली ते पाचवी तांदूळ प्रतिविद्यार्थी आठ किलो ८०० ग्रॅम, मूगडाळ दोन किलो १०० ग्रॅम व मटकी दोन किलो १०० ग्रॅम देण्यात येणार आहे. सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी तांदूळ १३ किलो २००ग्रॅम, मूगडाळ ३ किलो २०० ग्रॅम व मटकी तीन किलो १०० ग्रॅम देण्यात येणार आहे.
शाळांना देण्यात येणारा माल उतरून घेताना शाळेचे मुख्याध्यापक, व्यवस्थापन समिती सदस्य, पालक यांनी इलेक्ट्रॉनिक वजन काटय़ावर पुरवठादारांकडून वजन करूनच माल ताब्यात घ्यावा. त्याचबरोबर मालाचा दर्जा, वजन योग्य असल्याची खात्री करावी. तांदळाच्या गोण्यांवर अन्न महामंडळाचा शिक्का असल्याची खात्री करावी. शिक्का नसल्यास मालाचा स्वीकार करू नये.
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत जून ते सप्टेंबर २०२१ या कालावधीतील ८८ दिवसांसाठीच्या पोषण आहार योजनेंतर्गत तांदूळ व धान्य आदी माल विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. यासंदर्भात शाळांनी मागणी करण्याचे आदेश राज्य शिक्षण संचालकांच्या आदेशान्वये जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आले आहेत.