स्टुडंट पोर्टल वरून ठरणार विद्यार्थी:शिक्षक प्रमाण
प्रभाकर कोळसे: वृत्तसेवा
हिंगणघाट (२६/९) शालेय शिक्षण विभागाच्या ‘सरल ‘प्रणाली अंतर्गत स्टूडंट पोर्टल मध्ये विद्यार्थ्यांची दुबार नोंदणी झाली आहे. आता राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांना पडताळणी करून त्याचा अहवाल १ ऑक्टोबर पर्यंत प्राथमिक शिक्षण संचालकांकडे सादर करावा लागणार आहे.
स्टुडंट पोर्टल मध्ये समान नाव असलेले विद्यार्थी एका शाळेमध्ये वेगवेगळ्या वर्गांमध्ये अथवा वेगवेगळ्या शाळांमध्ये नोंद झाल्याचे निदर्शनास आले आहे. विद्यार्थी प्रत्यक्षामध्ये नक्की कोणत्या शाळेमध्ये व कोणत्या वर्गात शिकत आहे याची क्षेत्रीय. यंत्रणेमार्फत शाळांना भेट देऊन पडताळणी करावी लागणार आहे. ज्या शाळेतील ज्या वर्गामध्ये विद्यार्थी दुबार नोंद झालेले आहेत अशा दुबार नोंदी जनरल रजिस्टर व स्टुडंट पोर्टल मधून रद्द करण्यात यावेत. एकच आधार क्रमांक एकापेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या नावासमोर नमूद केला असल्यास याही विद्यार्थ्यांची पडताळणी करून योग्य त्या विद्यार्थ्यांच्या नावासमोर त्याचा आधार क्रमांक कायम ठेवण्यात येऊन इतर विद्यार्थ्यांच्या नावा सोबत नमूद केलेला आधार क्रमांक काढून विद्यार्थ्यांच्या अचूक आधार क्रमांकाची नोंद करावी. असे आदेश प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांना बजाविले आहेत.
@ यंदाच्या संचमान्यतेला’ आधार ‘ सक्तीचे
सत्र २०२१-२१ मध्ये राज्यातील शाळांची संचमान्यता विद्यार्थ्यांच्या’ आधार ‘संलग्नतेवर असणार आहे.राज्यातील सुमारे ८० -८५टक्के विद्यार्थी ‘सरल ‘ प्रणालीत आधार सलग्नीत आहे.राज्यातील शाळांतील विद्यार्थ्याचे आधार अपडेशन करण्यासाठी शाळांना यापुर्वीच कळविण्यात आले आहे.शाळा़च्या पटावर ३० सप्टे ला असलेली विद्यार्थी संख्या संचमान्यते करीता ग्राह्य धरली जाते.दरम्यान राज्यातील शाळांचे आधार अपडेशनची कामे प्रगतीपथावर असली तरी अद्याप पुर्णत्वास गेली नाही.मुदत संपत आली तरी १५-२० टक्के अद्याप बाकी आहे . आधार अपडेशनची कामे कामे करताना शाळांकडून’ सरल’ प्रणालीत चुकांचा कळस गाठला आहे.नव्हे’ सरल ‘ प्रणालीच ‘ वाकडी’ प्रणाली ठरली असल्याचे दिसून येते.एकच विद्यार्थी दोन इयत्तात , वेगवेगळ्या शाळांमध्ये दिसत असल्याने शाळांची संचमान्यता करताना अडचणी निर्माण झाल्या आहेत.परिणामी याची पडताळणी करण्याचे आदेश राज्याच्या शिक्षण संचालकांनी बजाविले आहे.सद्य स्थितीत राज्यात शाळांतील विद्यार्थ्यांचे १५-२० टक्के आधार अपडेशन काम बाकी असल्याने यंदाच्या संचमान्यतेत शाळांतील शिक्षक संख्येत घट होऊन राज्यातील शिक्षक अतिरिक्त होणार आहे.