विनंती शिवाय शिक्षकांच्या बदल्या नकोत- शिक्षक आमदार कपिल पाटील

383

कोरोनाची दुसरी लाट प्रचंड आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या यावर्षी नकोत ही मागणी आता जोर धरत आहे.

बदल्या ऑनलाईन असोत किंवा ऑफलाईन असोत यात राजकारण तरी होतं नाहीतर भ्रष्टाचार तरी होतो. विद्यार्थी आणि शिक्षकांचं हित पाहिजे असेल तर शिक्षकांच्या बदल्या विनंतीशिवाय केल्या जाऊ नयेत. तसेच शिक्षकांना नेमणूक देत असताना त्यांच्या सोयीच्या जिल्ह्यात देण्यात यावी व असे करताना विद्यार्थ्यांना त्यांची स्थानिक भाषा अवगत असलेले शिक्षक मिळण्याचा अधिकार शाबूत ठेवावा. (RTE Geographical and Linguistic disadvantage group)

वारंवार होणाऱ्या शिक्षकांच्या बदल्यांमुळे अनेक शिक्षक तणावाखाली आहेत. शिक्षकांचे शैक्षणिक कामकाज ही मानस प्रक्रिया असते. बदलीची टांगती तलवार सतत माथ्यावर लटकवलेली असल्यामुळे शिक्षकांची मानसिकता बिघडते. त्याचा आधी शिक्षकांच्या कार्यक्षमतेवर आणि पर्यायाने विद्यार्थ्यावर अन्याय होतो. त्यामुळे या बदली धोरणाचाच साकल्याने विचार करणे आवश्यक आहे.

त्यामुळे कृपया कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शिक्षकांची बदली प्रक्रिया तातडीने थांबवावी आणि जेव्हा परिस्थिती नियंत्रणात येईल तेव्हा बदल्या करताना पुढील मागण्यांबाबत विचार व्हावा, ही विनंती.

1) कृपाकरून विनंतीशिवाय इतर कोणत्याही ऑनलाईन किंवा ऑफलाईन प्रशासकीय बदल्या करू नयेत.

2) विद्यार्थ्यांना त्यांची स्थानिक भाषा अवगत असलेले शिक्षक मिळण्याचा कायद्याने दिलेला अधिकार शाबूत ठेवावा. (RTE Geographical and Linguistic disadvantage group)

3) जिल्हा अंतर्गत बदल्याही विद्यार्थी, शिक्षकांच्या सोयीनुसार आणि शिक्षकांच्या विनंतीनुसार करण्यात याव्यात.

4) रॅडम राऊंड व विस्थापित झालेले तसेच दुर्गम भागातील शिक्षकांवरील अन्याय दूर करावा. त्यांना त्यांच्या विनंतीनुसार बदली द्यावी.

5) पती-पत्नी एकत्रीकरणानुसार विनंती बदल्या कराव्यात.

6) महिला शिक्षकांची विनंती प्राधान्याने मान्य करावी.

7) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक व केंद्र प्रमुख यांची रिक्त पदे तातडीने भरावीत. पदोन्नतीची रखडलेली प्रक्रिया गतिमान करावी.

अशी विनंती शिक्षक आमदार श्री.कपिल पाटील यांनी मा. ना. श्री. हसन मुश्रीफ ग्रामविकास मंत्री, महाराष्ट्र राज्य.आणि मा. अतिरिक्त मुख्य सचिव ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन.यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here