राकेश नांद्रे,नाशिक:-
Covid-19 या साथीच्या रोगाने भारतात डोकं वर काढल्या पासून संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे आणि दुर्दैवाने प्रत्येक शासकीय विभागातील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावत असताना या आजारामुळे आपले प्राण गमावले आहेत. आणि परिस्थिती तिथे अधिक क्लेशदायक आहे जिथे तो अधिकारी किंवा कर्मचारी कुटुंबातील एकटाच कमविणारा असेल. इन्कम टॅक्स विभाग अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे. विभागाने पत्र काढून असे जाहीर केले आहे की या आजाराने मृत्यू पावलेल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यास अनुकंपा तत्वावर नेमणूक या योजनेअंतर्गत नोकरीत नेमणूक देण्यात येईल.
यासंदर्भात, या विभागाचे परिपत्रक क्रमांक O.M. No. 14014/94-Estt(D) दिनांक 09.10.1988 नुसार असे निर्देशित करण्यात आले आहे की केंद्रशासनाच्या अनुकंपा तत्त्वावरील नेमणूक योजने अंतर्गत, सेवेत असताना प्रतिकूल परिस्थितीत मृत्यू आलेल्या किंवा वैद्यकीय आधारावर निवृत्ती घेतलेल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील त्याच्यावर अवलंबून असलेल्या सदस्यास अनुकंपा तत्त्वावर नेमणूक देण्यास परवानगी देण्यात येत आहे. सदर योजना ही वेळोवेळी अद्ययावत करण्यात आलेली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश हा अशा शासकीय कर्मचाऱ्याच्या कुटुंबास आर्थिक विवंचनेतून मुक्त करणे आणि अशा आणीबाणीच्या काळात त्यांना मदत करणे हा आहे.
अध्यक्ष, केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड यांचेकडील पत्र दिनांक 4 मे 2021 नुसार विभागातील एखाद्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या दुर्दैवी मृत्युनंतर कर्मचारी मृत्यु/सेवा निवृत्ती लाभ/ कुटुंब निवृत्ती वेतन योजनेच्या कागदपत्रांवर लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यात पुढे असेही निर्देशित करण्यात आले आहे की, अशा सर्व घटनांमध्ये मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील सदस्यांना अनुकंपा तत्त्वावरील नेमणूक योजना बद्दलची माहिती व सल्ला देण्यात यावा आणि सदर योजनेतून अर्ज करण्याबाबत सर्वतोपरी मदत त्वरित करण्यात यावी. अशा अर्जांवर त्वरित वेगाने कारवाई करून त्यांना त्वरित निकाली काढण्यात यावे आणि अशा बाबतीत मानव संसाधन विकास निदेशालयाशी त्वरित संपर्क साधण्यात यावा जेणेकरून सदर योजनेअंतर्गत मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील सदस्याने केलेल्या अर्जावर वेगाने कार्यवाही करता येईल किंवा त्यांना सदर योजने बाबत अधिक माहिती पुरवता येईल.
इन्कम टॅक्स विभागाने उचललेल्या या पाऊल बद्दल विभागाचे खरोखर अभिनंदन करायला हवे. यामुळे मृत झालेल्या कर्मचारी किंवा अधिकारी यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबास खरोखर पुन्हा उभे राहण्यास सहाय्य मिळणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या प्रत्येक विभागाने सुद्धा आपल्या अधिनस्त असलेल्या व या काळात मृत झालेल्या कर्मचारी / अधिकारी यांच्या कुटुंबातील सदस्यास अनुकंपा तत्वावर नेमणूक देऊन त्या कुटुंबाला आधार देण्याची गरज आहे.